रत्नागिरी : रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतमातेला अनोखी ‘पत्ररूपी’ भेट दिली. व्हॉट्सअॅपच्या युगात पत्र लिहिण्याचा विसर पडला असल्याने मराठी विभागाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन पोस्ट कार्डावर पत्र लिहिण्यास प्रवृत्त केले.
‘आईचं पत्र हरवलं’, ‘डाकिया डाक लाया’ यांसारखे खेळ आणि गाणी कालौघात लुप्त होत चालल्याने पत्रलेखनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा, असा हेतू ठेवून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या पत्रलेखन स्पर्धेत साक्षी पंडित प्रथम आली. ऋतुराज मराठे द्वितीय, तर शुभराणी होरंबे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. ओंकार ओक याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
सर्व विजेत्यांना स्वातंत्र्यदिनी झालेल्या समारंभात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सर्व पत्रे महाविद्यालयाच्या फलकावर प्रदर्शित करण्यात आली आणि नंतर देवरुखच्या शहीद जवान स्मारकात (ता. संगमेश्वर) प्रदर्शनासाठी पाठवण्यात आली आहेत. या उपक्रमात अनेक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन आणि प्रा. सायली पिलणकर यांनी या उपक्रमाकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.